स्वराज्य महोत्सव भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात व राज्यात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान राज्यात व देशात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी "स्वराज्य महोत्सव" या संकल्पनेस अनुसरून नुकताच शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
काय आहे हा स्वराज्य महोत्सव:
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाची चळवळ असणाऱ्या 'चले जाव चळवळीची" सुरुवात मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान येथे झाली होती. त्यामुळे ९ ऑगस्ट या दिनाचे औचित्य साधून, स्वराज्य महोत्सव राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ या दरम्यान राज्य पातळी, जिल्हा पातळी, तालुका पातळी, ग्राम/वार्ड पातळी अशा विविध स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त सहभाग असावा यासाठी, ग्राम व वार्ड स्तरावर कार्यक्रमांचे वेळापत्रकही निश्चित केलेले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, युवक, शेतकरी, उद्योजक, सेवा पुरवठादार, प्रशासकीय यंत्रणा तसेच समाजातील अन्य सर्व घटकांचा सहभाग असणे अभिप्रेत आहे.
बुजुर्गों की बात देश के साथ, जन उत्सव जन के द्वारा, मेरा गाव मेरी धरोहर, विद्यार्थी विरासत योजना अशा वेगवेगळ्या संकल्पनातून लोक सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.